आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी शुक्रवार, दि. १२ जून २०२६ रोजी सायंकाळी शहरातील विविध भागांतील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या स्वच्छता व गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेतला.
यावेळी आयुक्तांनी नमुना गल्ली, अंबानाला, भुतेश्वर चौक, पन्नालाल नगर, समाधान नगर व मालवीय चौक परिसरातील नाल्यांची पाहणी केली.
पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता असलेले भाग, नाल्यांची वहनक्षमता, गाळ काढण्याची प्रगती तसेच पावसाचे पाणी सुरळीतपणे वाहून जाण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.
पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये साचलेला गाळ, प्लास्टिक, कचरा व इतर अडथळे आढळून आले. या अडथळ्यांमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचणी निर्माण होऊन जलभरावाची समस्या उद्भवू शकते, असे आयुक्तांनी नमूद केले.
ज्या ठिकाणी कामे अपूर्ण आहेत किंवा अतिरिक्त उपाययोजनांची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आयुक्त वर्षा लड्डा यांनी अमरावतीकरांना आवाहन करताना सांगितले की, नाले, गटारे व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. अनेक वेळा घरगुती कचरा, प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल, बांधकाम साहित्य तसेच व्यावसायिक आस्थापनांचा कचरा नाल्यांमध्ये टाकला जातो.
त्यामुळे नाल्यांचा प्रवाह अडथळित होऊन पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या समस्या निर्माण होतात.
विशेषतः शहरातील हॉकर्स, फेरीवाले, व्यावसायिक प्रतिष्ठानधारक तसेच नागरिकांनी नाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शहर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनास नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नमुना गल्ली आणि अंबानाला परिसरात नाल्यांची स्थिती तपासताना आयुक्तांनी पावसाचे पाणी अडथळ्याविना वाहून जाण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती घेतली.
भुतेश्वर चौक परिसरातील जलनिस्सारण व्यवस्थेची पाहणी करताना पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच पन्नालाल नगर येथील नाल्यांच्या स्वच्छतेची पाहणी करून संबंधित विभागाला नियमित देखरेख ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना संबोधित करताना आयुक्तांनी पावसाळी कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे अधिक प्रभावीपणे राबविणे, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे तसेच नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिकेकडून शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या पावसाळी कामांचा नियमित आढावा घेतला जात असून, प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येत आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी उपायुक्त नरेंद्र वानखडे, शहर अभियंता रवींद्र पवार, कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, उपअभियंता दिनेश हंबर्डे, अभियंता लक्ष्मण पावडे, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
“स्वच्छ नाले, सुरक्षित अमरावती” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने नाल्यांमध्ये कचरा टाकणे टाळावे. हॉकर्स, व्यावसायिक प्रतिष्ठानधारक व नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करून शहर जलभरावमुक्त ठेवण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन आयुक्त वर्षा लड्डा यांनी यावेळी केले.




