प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती – आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांची पाहणी, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

अमरावती (प्रतिनिधी) :
अमरावती महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी आज दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी विठ्ठलवाडी जुनीवस्ती, बडनेरा येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या साईटवर नागरिकांच्या तक्रारीनुसार साफसफाई व रस्त्यांची पाहणी केली.
यावेळी सर्व्हे क्र. १०/३ येथे जीडीसीएल या जुन्या कंत्राटदाराने केलेल्या बांधकामातील त्रुटींविषयी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने पाहणी करण्यात आली. तसेच पवननगर नवीवस्ती, सर्व्हे क्र. १९९ येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाची सखोल पाहणी करून कंत्राटदारांच्या अडचणी ऐकून घेतल्या.

दरम्यान, सर्व्हे क्र. १९९ मधील साईटवर काही स्थानिक नागरिक कामात अडथळे निर्माण करत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यावर तत्काळ कार्यवाही करत आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी बडनेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल चव्हाण यांना नागरिकांना आळा घालण्यासाठी व नियमित पेट्रोलिंग करण्याचे निर्देश दिले.

महानगरपालिकेकडून प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्व कामे गतीमान करण्यासाठी प्रशासन व पोलिसांचे समन्वयाने प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी आयुक्‍तांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्‍यांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. सदर नागरिकांच्‍या समस्‍यांचे निराकरण करण्‍याचे निर्देश आयुक्‍तांनी संबंधीतांना दिले.

महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी निर्देश दिले की, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरु असलेली कामे गतीमान व दर्जेदार पद्धतीने पार पाडावीत. बांधकामात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत याची दक्षता कंत्राटदारांनी घ्यावी. स्थानिक नागरिकांनी कामात अडथळा आणू नये, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास पोलिस प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे व नियमित पेट्रोलिंग करावे. नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी. सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने समन्वय साधावा. कंत्राटदारांनी अडचणी प्रामाणिकपणे मांडाव्यात व प्रशासनाने त्या तातडीने सोडवाव्यात.

महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी आवाहन केले की, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरु असलेली गृहनिर्माण कामे ही सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांशी निगडीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी या कामांमध्ये अडथळा आणू नये, उलट सहकार्य करून ही योजना यशस्वी होण्यासाठी पुढाकार घ्यावा. नागरिकांनी आपले प्रश्न व अडचणी प्रशासनासमोर मांडाव्यात, अडथळे निर्माण करू नयेत. शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सकारात्मक सहभाग नोंदवावा. प्रधानमंत्री आवास योजना ही सर्वांसाठी घरकुल उपलब्ध करून देणारी महत्त्वाची योजना असल्याने तिच्या अंमलबजावणीस सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे. शहराच्या प्रगतीसाठी प्रशासन, कंत्राटदार आणि नागरिक या तिघांचा समन्वय आवश्यक आहे.

या पाहणी दरम्‍यान शहर अभियंता रविंद्र पवार, प्रधानमंत्री आवास योजनेचे उपअभियंता लक्ष्‍मण पावडे, वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ.अजय जाधव, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, धनंजय शिंदे, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक शारदा गुल्‍हाणे, स्‍वास्‍थ निरीक्षक, मनपा कर्मचारी, स्‍थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top