महानगरपालिकेमध्‍ये स्‍वातंत्र्य दिनाचा ७९ वा वर्धापन दिन उत्‍साहात साजरा गुणवंत कर्मचा-यांचा सत्‍कार

अमरावती महानगरपालिका तर्फे स्‍वातंत्र्य दिनाचा ७९ वा वर्धापन दिन साजरा करण्‍यात आला. स्‍वातंत्र्य दिनाच्‍या ७९ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त शनिवार दिनांक १५ ऑगस्‍ट,२०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे शुभहस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आला.

मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते महानगरपालिका प्रांगणात स्‍वातंत्र्य दिनाचा ७९ वा वर्धापन दिनानिमित्य अमरावती महानगरपालिका तर्फे गुणवंत सफाई कामगार श्रीमती निलम शैलेंद्रसिंग चव्‍हाण, श्री. अमर सुरेश जावे, श्रीमती कोमल विनोद गोहर, श्री.गणेश संजय चावरे, श्रीमती इंदु सुरेश चव्‍हाण, श्री.राजकुमार बंडु पासरे, श्रीमती उमा समुद्रे, श्री.नरेंद्र डुलगज, श्रीमती गीता बागडे, श्री. गणेश सांडे या कामगारांचा सत्‍कार करण्‍यात आला.

यावेळी मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांनी स्‍वातंत्र्य दिनाचा ७९ वा वर्धापन दिनाच्या मंगलमय प्रसंगी, अमरावतीच्या जनतेला व उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्‍या. आजचा दिवस केवळ ध्वजारोहणाचा दिवस नाही, तर हा दिवस आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हजारो ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना कृतज्ञतेने स्मरण करण्याचा.

अमरावती महानगरपालिका आज आपल्या ४३ व्या वर्धापन दिनाचा प्रवास पूर्ण करून नव्या दिशेने वाटचाल करत आहे. या ४३ वर्षांच्या प्रवासात अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि लाखो नागरिकांनी अमरावतीच्या विकासासाठी योगदान दिले आहे.

आज या विकासाचा वेग आणखी वाढविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. नागरिकांच्या जीवनाशी सर्वाधिक जवळचा विषय म्हणजे पाणी आणि स्वच्छता. अमरावतीच्या भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणीपुरवठ्याचे जाळे मजबूत करण्याचे काम सुरू आहे.

अमृत-२ अंतर्गत सुमारे ९८५ कोटी ४९ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. उर्ध्व वर्धा धरणातून भविष्यातील अमरावतीची तहान भागविण्याच्या दिशेने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.

त्याचबरोबर ‘स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती’ या संकल्पनेतून घरोघरी कचरा संकलन, घनकचरा व्यवस्थापन, MRF प्रकल्प आणि भूयारी गटार योजनेसारखी कामे पुढे जात आहेत.

सुकळी डेपोवरील कचऱ्याचे डोंगर ही एकेकाळची मोठी समस्या होती. मात्र बायोमायनिंग आणि आधुनिक घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्या समस्येवर मार्ग काढण्याचे काम झाले आहे. शिक्षण हे शहराच्या भविष्याची खरी गुंतवणूक आहे.

महानगरपालिकेच्या ६३ शाळांमधील ११ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना डिजिटल बोर्ड, संगणक प्रयोगशाळा आणि आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्या शहरातील अभ्यासिका आणि ग्रंथालयांच्या माध्यमातून हजारो तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशाची संधी मिळत आहे.

आरोग्याच्या क्षेत्रातही १३ नागरी आरोग्य केंद्रे आणि १२ आयुष्मान आरोग्य मंदिरे नागरिकांच्या सेवेत कार्यरत आहेत. गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना घरकुल मिळावे, विधवा व एकल महिलांना रोजगाराची संधी मिळावी, छोट्या व्यावसायिकांना आर्थिक आधार मिळावा—यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहे.

आज अमरावती डिजिटल परिवर्तनाच्या दिशेनेही वेगाने पुढे जात आहे. MyAmravati ॲप, ऑनलाइन सेवा, ई-टॅक्स, ऑनलाइन व्हिजिटर पास, सॅटेलाईट मॅपिंग यांसारख्या सुविधांमुळे प्रशासन आणि नागरिकांमधील अंतर कमी होत आहे. पारदर्शक प्रशासन, गतिमान सेवा आणि नागरिककेंद्री कारभार हीच भविष्यातील महानगरपालिकेची ओळख असली पाहिजे.

शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये सिमेंट रस्ते, चौकांचे सौंदर्यीकरण, छत्री तलाव आणि वडाळी तलावाचे नूतनीकरण, ऐतिहासिक परकोटाचे जतन आणि शिवटेकडीवरील भव्य शिवसृष्टी अशा विविध प्रकल्पांमधून अमरावतीला नवी ओळख देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

भविष्यात Fisheries Hub, PM E-Bus आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेसारख्या प्रकल्पांमुळे अमरावतीच्या विकासाला आणखी नवी दिशा मिळणार आहे.

स्वातंत्र्य दिन व अमरावती महानगरपालिकेचा वर्धापन दिनाच्या आनंदाच्या पर्वानिमित्त अमरावतीकर नागरिकांना एक महत्त्वपूर्ण दिलासा देताना मला विशेष आनंद होत आहे.

मालमत्ता कराच्या थकीत रकमेवरील शास्तीमध्ये विशेष सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत शास्तीमध्ये १०० टक्के सवलत, १ ते १५ सप्टेंबरपर्यंत ७५ टक्के, १६ ते ३० सप्टेंबरपर्यंत ५० टक्के, तर १ ते १५ ऑक्टोबरपर्यंत २५ टक्के सवलत देण्यात येत आहे.

अमरावतीकरांना आवाहन करतो की, ही संधी गमावू नका. मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा करून शास्तीमधील या विशेष सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्या. आपण भरलेला प्रत्येक रुपया हा केवळ कर नसून अमरावतीच्या विकासासाठीची आपली भागीदारी आहे.

अमरावतीला महाराष्ट्रातील एक स्वच्छ, सुंदर, हरित, आधुनिक आणि विकासाच्या बाबतीत आदर्श शहर बनविण्याचा संकल्प आपण सर्वांनी करूया.

यावेळी स्‍वातंत्र्य दिनाच्‍या ७९ वा वर्धापन दिनानिमित्‍त शिक्षक विजय खंडारे यांनी देशभक्‍तीपर राष्‍ट्रगीत व राज्‍यगीत सादरीकरण केले.

या कार्यक्रमाचे बॅंन्‍ड पथकाचे संचालन व सुत्रसंचालन विजयकुमार खंडारे, मो. हाफिजखान, एन.बी. सोनवणे सर यांनी केले.

या कार्यक्रमामध्‍ये महानगरपालिका आयुक्‍त डॉ.मंगेश गोंदावले, मा.आयुक्‍त यांच्‍या आई श्रीमती शर्मिला गोंदावले, स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, गटनेता डॉ.राजेंद्र तायडे, झोन सभापती स्‍वाती कुलकर्णी, झोन सभापती इस्‍माईल लालुवाले, शिक्षण समिती सभापती प्रीती रेवणे, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, उपसभापती सुमती ढोके, महिला व बाल कल्‍याण समिती सभापती ममता आवारे, विधी समिती उपसभापती डॉ.मधुरा कहाळे, नगरसेवक आशिष अतकरे, मिलींद चिमोटे, संजय नरवणे, मिलींद बांबल, प्रमोद महल्‍ले, मनिष बजाज, सचिन वैद्य, प्रशांत वानखडे, महेश मुलचंदानी, सैय्यद राशद अली सै. शौकत अली, संजय तिरथकर, सै. मुनज्जर अली, नगरसेविका सुनिता भेले, ललिता रतावा, पद्मजा कौंडण्‍य, लविणा हर्षे, अर्चना पाटील नंदा सावदे, अर्चना पांडे, विद्या माटे, स्मिता सुर्यवंशी, शाह बीबी बतुल ताहेर, राजु कुरील, सुरेश रतावा, अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्‍पा नाईक, उपायुक्‍त योगेश पिठे, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, उपायुक्‍त भाग्‍यश्री बोरेकर, मुख्‍यलेखापरिक्षक श्‍यामसुंदर देव, मुख्‍यलेखाधिकारी शिल्‍पा पवार, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top